रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील केंद्राने पुढाकार घेऊन २१ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सागरकिनारा स्वच्छता दिन साजरा केला. रत्नागिरीमधील भाट्ये किनाऱ्यावर सकाळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील ईकरा पब्लिक स्कूल, फिनोलेक्सचे मुकुल माधव इंग्लिश स्कूल, रत्नागिरी नर्सिंग स्कूल व जनरल हॉस्पिटल यांचे विद्यार्थी, तसेच मिलिटरी अभियांत्रिकी सेवा विभागाचे कर्मचारी, स्वयंप्रेरित नागरिक आणि तटरक्षक दलाचे जवान अशा एकूण सुमारे ५०० जणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक वायू अवस्थानचे कमान अधिकारी उपमहानिरीक्षक अनिलकुमार परियाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या उप समादेशक रश्मी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना सागरकिनारा स्वच्छतेचे महत्त्व सांगताना ‘प्रत्येक नागरिकाने सागरकिनाऱ्याची नियमित स्वच्छता राखली पाहिजे,’ असे आवाहन केले. ‘प्लास्टिक व इतर कचरा यामुळे पर्यावरण दूषित होतेच; पण त्याबरोबर सागरी प्राण्यांच्या जिवास धोका निर्माण होतो आणि पर्यावरण संतुलन बिघडते. सागरकिनारा स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरित होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शाळा हे सर्वांत उचित माध्यम आहे,’ असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील केंद्रातील कमान अधिकारी कमांडंट अतुल दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या सागरकिनारा स्वच्छता मोहिमेची सुरुवात ‘तटरक्षिका’ या रत्नागिरीतील तटरक्षक पत्नी कल्याण संघटनेच्या प्रमुख सीमा नायर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. उप-समादेशक धिल्लन, सहायक समादेशक आशितकुमार, सहायक समादेशक कैलाश कुमार आदी अधिकारी आणि सुमारे १५० जवानांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या कार्यक्रमादरम्यान लेफ्टनंट सर्जन कमांडर प्रशांत पाटील यांच्या देखरेखीखाली मेडिकल फर्स्ट एड सुविधा सज्ज होती. तसेच खबरदारी म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे निष्णात पाणबुडे (डायव्हर) तैनात ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी नगर परिषद, सिव्हिल हॉस्पिटल आणि पोलिस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोळा करण्यात आलेला सुमारे एक टन कचरा उपक्रमानंतर नगर परिषदेच्या गाड्यांमार्फत विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला.
तटरक्षक दल स्थानिक संस्थांच्या मदतीने संपूर्ण देशभरात दर वर्षी सप्टेंबर महिन्यात सागरी व किनारी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या योजनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियानाचे आयोजन करते.